लाल किल्ल्यावरील महिलेचा दावा फेटाळला   

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर दावा करणार्‍या एका महिलेचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. मुघल बादशाह बहादूर शहा जफर (द्वितीय) यांची खापर नातसून असल्याचा दावा सुलताना बेगम या विधवा महिलेने करुन लाल किल्ला आमचा असल्याचे म्हटले होते. 
 
सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि संजय कुमार यांनी बेगम यांच्या अर्जावर काल सुनावणी करताना त्यांचा अर्ज फेटाळून लावला. अर्ज खोडसाळ आणि अयोग्य आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने अर्जाची दखल कशी काय घेतली अशा शब्दांत फटकारले आहे. खोडसाळ आणि अयोग्य अर्जावर सुनावणी घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच बेगम यांच्या वकिलांना अर्ज मागे घेण्याचे आदेशही दिले. बहादूर शहा जफर पहिले स्वातंत्र्ययोध्ये होते, असे बेगम यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यावर सुनावणी वेळी सरन्यायाधीश खन्ना म्हणाले,  बेगम आणि  त्यांच्या कुटुंबांनी केवळ लाल किल्ल्यावरच का दावा केला. आग्रा, फत्तेपूर सिक्रीसह अन्य किल्ल्यांवर का केला नाही ? 
 
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने  गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी बेगम यांचा आव्हान अर्ज फेटाळून लावला होता. २० डिसेंबर २०२१ मध्ये एक सदस्यीय न्यायाधीशांनी लाल किल्ल्यावर तुम्हाला दावा  करता येणार नाही, असा निकाल दिला होता. बेगम यांनी दावा केला होता. जफर यांच्याकडून ईस्ट इंडिया कंपनीने लाल किल्ला बेकायदा ताब्यात घेतला होता. नंतर तो भारत सरकारच्या ताब्यात गेला; परंतु वारसा हक्काने तो आमचा आहे. पण, न्यायालयाने घटना बिटिश काळातील आणि दीडशे वर्षे जुनी आहे. त्यामुळे आता असा अर्ज सुनावणीस घेता येणार नाही, असे आदेशात नमूद केले. 
 
दरम्यान, बेगम यांनी मुलीचे निधन झाल्याचे कारण सांगून सुमारे अडीच वर्षानंतर निकालाला आव्हान देणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला होता. या संदर्भातील त्यांनी केलेले खुलासे न्यायालयाने नाकारुन अर्ज फेटाळत असल्याचे सांगितले. 
 

Related Articles